धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक प्रयत्न करणार- CM शिंदे:सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलकांकडून उपोषण सुरू केले आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेतली असून या बाबत सरकारने आज सह्याद्री अतिथीगृहावर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत धनगर समाजाकरीता काही सकारात्मक निर्णयदेखील घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर, धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलले जातील. परंतु हा समावेस कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल. याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व त्यांची विचारपूस देखील केली. बैठकीत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव गणेश पाटील उपस्थित होते. इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, धनगर समाजाची अनुसूचित जमातीच्या समावेशाची मागणी खूप वर्षे प्रलंबित आहे. हा समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या समावेशाबाबत स्थापन करण्यात आलेल्या डॉ. सुधाकर शिंदे समितीलाही लवकरात लवकर अहवाल देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. डॉ. शिंदे यांनी समितीच्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी शिष्टमंडळातील आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार सर्वश्री प्रकाश शेंडगे, रामहरी रुपनवर, रामराव वडकुते तसेच समन्वय समितीचे पांडुरंग मेरेगळ, विजय गोफने, पंकज देवकते, मधु शिंदे यांनी विविध मुद्दे मांडले. माजी मंत्री महादेव जानकर तसेच समन्वय समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय- शंभुराज देसाई बैठकीनंतर शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. देसाई म्हणाले की, सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी होती की, धनगर आणि धनखड हे एकच आहेत, अशा पद्धतीचा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा. तो जीआर कशापद्धतीचा असावा, यासाठी तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची, तसेच त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आले होते, त्यापैकी पाच प्रतिनिधी यांची समिती स्थापन करुन त्यांनी हा जीआरचा मसुदा कसा असावा, जीआर काढला तर तो कोर्टात टीकला पाहिजे, या बाबतीत ती समिती लगेचच चार दिवशात बसेल आणि जीआरचा ड्राफ्ट तयार करतील. अॅडव्होकेट जनरल साहेबांचं त्यावर मत घेतलं जाईल आणि पुढची कार्यवाही सकारात्मक करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. देसाई पुढे म्हणाले- जे उपोषणकर्ते पंढरपुरात बसले आहेत, त्यांना राज्य सरकारने विनंती केली आहे की, त्यांनी उपोषण स्थगित करावं. त्यासाठी आम्ही विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे. आम्ही उपोषणाला बसले आहेत त्यांच्याशी तातडीने चर्चा करु आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करु. धनगर समाजाच्या बहुतांश मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. सरकारने सकारात्मक आश्वासन दिलं असल्याचेही शंभूराज देसाई म्हणालेत.