शोध मराठी मनाचा जागतिक संमेलनाचे उद्घाटन:मराठी मनांच्या शोधामध्ये तंत्रज्ञानाचे आदान प्रदान व्हावे, शरद पवार यांचे प्रतिपादन

जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून जागतिक संमेलनाचे उद्घाटन आणि त्या माध्यमातून मराठी मनाचा शोध हा उपक्रम एका वेगळ्या जाणीवांचा आहे. संमेलने ही साहित्यिकांची नसतात, तर ती विचारांची आदान प्रदान केंद्र ठरावीत. तसेच तंत्रस्नेही समाज देशाच्या अर्थव्यवस्थेला एका उन्नत बिंदूवर नेऊन ठेवू शकतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मराठी मनाचा या जागतिक संमेलनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या छ. शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, बीव्हीजी ग्रुपचे संचालक हनुमंतराव गायकवाड, संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ आ. ह. साळुंखे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, उल्हासदादा पवार इत्यादी उपस्थित होते. शरद पवार पुढे म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञान हे मानवाच्या उत्कर्षाचे साधन आहे. रयत शिक्षण संस्थेने पारंपारिक शिक्षण व्यवस्थेत न अडकता अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी परदेशातील विद्यापीठांशी करार केलेला आहे. आजच्या युगातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचा प्रयोग कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यवसायांमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. जागतिक पातळीवर मराठी माणूस पोहोचला आहे. मात्र त्याने इतिहासात रमून चालणार नाही तर इतिहासातील संदर्भातून त्याने भविष्यातील वाटचाल करणे गरजेचे आहे. मराठी माणसाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली आहे. हनुमंतराव गायकवाड आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी आपल्याला सिद्ध केले आहे. यावरून मराठी माणसाची भरारी दिसून येते. मात्र अशी संमेलने ही केवळ साहित्यिकांची नसावी तर यामध्ये समाज पोषक विचारांचे आदान प्रदान व्हावे. त्यातूनच निकोप आणि समाजाचा एकजिनसीपणा वाढत असतो, असे शरद पवार म्हणाले. संमेलन अध्यक्ष प्रा. डॉ आ. ह. साळुंखे म्हणाले, समाजाची संमिश्रता बहुविविधता पाहता आपल्या समाजात आंतरिक ऐक्य राहणे गरजेचे आहे. मानवी संस्कृती खऱ्या अर्थाने उन्नत करायची असेल तर सामाजिक ऐक्य आणि पुरोगामी विचार या माध्यमातून आपल्याला पुढे जावे लागेल. 21 व्या शतकातील भारत खऱ्या अर्थाने महासत्ता करायचा असेल तर एका बाजूला केवळ काही मोजक्या व्यक्ती व समूह अतिशय समृद्ध व संपन्न व दुसऱ्या बाजूला असंख्य व्यक्ती अज्ञानी ,अनारोग्य ,ज्ञ निरक्षरता , कुपोषण ही विषमता असून चालणार नाही. विषमतेने कलुशीत समाज कोणतीही प्रगती करू शकत नाही आणि मूळ समाज व्यवस्थेची एकात्म होऊ शकत नाही. त्यासाठी समाज रचनेतील दरी मिटवावी लागेल आणि त्यासाठी विज्ञानाधिष्ठीत समाज निर्माण करावा लागेल, असे मत त्यांनी मांडले. उच्च तंत्रज्ञान व शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवन सुखकर होते आहे. महाराष्ट्र आणि त्या माध्यमातून होणारी परकीय गुंतवणूक ही एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राची निर्मिती क्षमता आणि त्याचे योगदान हे अमूल्य आहे. रोजगार क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या आजारी औद्योगिक वसाहती या समृद्ध केल्या जातील आणि त्याकरता तंत्रस्नेही रोजगार व कौशल्य विकास या दोन मुद्द्यांवर राज्य सरकारने भर दिला आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, बीव्हीजीचे संचालक हनुमंतराव गायकवाड यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वागत रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी केले. मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शोध मराठी मनाचा या संमेलनाचा मूळ हेतू स्पष्ट करून अशी संमेलने समाजाच्या उन्नतीसाठी पूरक ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Share

-