आईची आठवण जपण्यासाठी लेकरांनी घरासमोरच उभारलं स्मारक, पुण्यातील गोळे कुटुंबीयांचा आदर्श
Pune Mother Memorial : आईच्या निधनानंतर कुटुंबीयांना घर रिकामे रिकामे वाटत होते. आईबद्दल असलेली आस्था, आपलुकी आणि प्रेम सतत आपल्यासोबत राहावे यासाठी भावंडांनी थेट घरासमोर आईचे स्मारकच उभारले आहे.

पुणे : आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, असे आपण नेहमीच म्हणत असतो. आजच्या धावत्या जगात आई-वडिलांचे महत्त्व कमी होत असल्याची भीती आजूबाजूंना घडणाऱ्या घटनांमुळे वाटते. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असणाऱ्या नांदे गावातील दोन भावंडांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ घरासमोरच आईचे स्मारक उभे केले आहे. फायबरपासून बनवलेला आईचा हुबेहूब पुतळा घराच्या अंगणात स्थापन केला आहे. शिक्षक असलेल्या सुनील गोळे आणि मेकॅनिक असलेल्या संतोष गोळे या दोघा भावांनी हा पुतळा उभारून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीचं कौतुक केले जात आहे. गोळे कुटुंब हे भोर तालुक्याच्या नांदे गावातील आहे. शिक्षक असलेले सुनील दत्तात्रय गोळे आणि मेकॅनिक असलेले संतोष दत्तात्रय गोळे हे दोघे भावंडं. त्यांची आई राहीबाई गोळे (वय ६२ वर्ष) यांचे करोना काळात निधन झाले होते. पुण्यातील बाणेर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परंतु आईविषयी असणारे प्रेम, श्रद्धा, भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरासमोरच मंदिर उभारुन त्यात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कुटुंबाने आईचे स्मारक उभारुन एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.कै. राहीबाई यांनी शेती आणि सामाजिक कार्याची आवड असणारे पती दत्तात्रय गोळे यांच्यासोबत ४५ वर्ष सुखात संसार केला. दोन मुले आणि दोन मुलींना चांगले शिक्षण देऊन संस्कार दिले. आईच्या निधनानंतर इतर सदस्य असूनही कुटुंबीयांना घर रिकामे रिकामे वाटत होते. त्यामुळे आईबद्दल असलेली आस्था आपलुकी आणि प्रेम सतत आपल्यासोबत राहावे यासाठी या दोन भावंडांनी थेट घरासमोर आईचे स्मारकच उभारले आहे. आईची आठवण जपण्यासाठी काय करावे असा प्रश्न मनात सतावत होता. त्यावेळी राहीबाई यांचे पती दत्तात्रय गोळे तसेच सुनिल, संतोष ही दोन मुले, निलीमा खंडाळे, प्रमिला पाडळे या दोन मुली आणि संतोष पाडळे (जावई) यांच्या विचारातून स्मारक बांधण्याचे विचार पुढे आला. दि. ८ एप्रिल रोजी पुतळा अनावरण सोहळ्याने सत्यात उतरले आहे. मुलांनी आईच्या आठवणीत बांधलेले हे स्मारक आयुष्यभर पुरणारे आहे. ज्या व्यक्ती आईवडिलांचा तिरस्कार करतात, राग राग करतात त्यांच्या डोळ्यात गोळे बंधूंनी केलेली कृती अंजन घालणारी आहे. त्यामुळे आई वडिलांना जपा, तरच आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणावं लागेल.