News Image

पाकिस्तान लाइव्ह:लाहोर ते कराची हादरले, पाकची तिजोरीही रिकामी; चीन, तुर्कीकडून मिळालेल्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर पाक लष्करप्रमुखांचा देखावा


‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये ९ अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त झाल्याने निराश झालेला पाकिस्तान भारतीय लष्करी ठिकाणे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा सतत अयशस्वी प्रयत्न करत आहे. गेल्या २४ तासांत त्याने भारतातील ४ राज्यांत १५ हून अधिक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, परंतु भारतीय सैन्याने त्यांची सर्व शस्त्रे हवेतच नष्ट केली. यात भारत भूमीचे कोणतेच नुकसान झाले नाही. लष्करी तळांना लक्ष्य केल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकच्या लष्करी तळांवर ‘हल्ला’ केला. त्याची दोन एफ-१६ विमानेही पाडली. तथापि, भारतीय लष्कराने याची पुष्टी केली नाही. दुसरीकडे, भारतीय लष्करी सूत्रांनी युद्धास अतुर पाक सैन्याच्या कारवायांची तुलना ‘हमास’च्या दहशतवादी हल्ल्यांसारखी म्हटले. वास्तविक, गेल्या महिन्यातच पाक गुप्तचर संस्था आयएसआय व हमास दहशतवाद्यांत पीओकेत एक बैठक झाली. दुसरीकडे, गुरुवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भारताच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे लाहोर व कराची हादरले. रात्री उशिरा पाकने ३ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील १५ शहरांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केले. सकाळी भारतीय लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली. दुसरीकडे, भारतीय युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ अरबी समुद्रात अलर्ट मोडमध्ये तैनात आहे. कराचीत पाकिस्तानचे सर्वात मोठे बंदर आणि नौदल मुख्यालय आहे. तत्पूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी गुरुवारी सायंकाळी ५:३० वा. भारतीय सैन्याच्या दिवसभरातील कारवायांची माहिती दिली. भारतीय सैन्याने ‘एस ४०० सुदर्शन चक्र’ या हवाई संरक्षण प्रणालीने पाकची शस्त्रे हवेतच हाणून पाडली. पाकिस्तानच्या हल्ल्याला लष्कराने त्याच भागात आणि त्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले. भारताने लाहोर आणि रावळपिंडीत ड्रोन हल्ले केले. पाक लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद चौधरी म्हणाले, ‘भारताने आमच्या सीमेवर २५ ‘हारोप’ ड्रोन पाठवले. यापैकी ४ जण रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात पोहोचले. रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोनचा स्फोट झाला. यामुळे पाकिस्तान सुपर लीगचा सामना रद्द करावा लागला. चार पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले. जयशंकर म्हणाले आम्ही प्रत्युत्तर देऊ भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे अमेरिकी समकक्ष मार्को रुबियो, इटलीचे अर्थमंत्री व युरोपियन युनियन उपाध्यक्षांशी चर्चा केली आहे. जयशंकर यांनी त्यांना सांगितले, ‘भारताने प्रत्युत्तराचा अधिकार वापरणे सुरू केले.’ रुबियोंनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा दिला. त्यांनी पाकला चिथावणीखोर कारवाया थांबवण्याचा सल्ला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, तिन्ही सैन्य दल प्रमुख आणि केंद्रीय सचिवांची बैठक घेतली. गृहमंत्री अमित शाह यांनी निमलष्करी दलांच्या महासंचालकांसोबत तयारीचा आढावा घेत दक्षतेच्या सूचना दिल्या. भारताच्या सूचनेनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने चुकीची माहिती पसरवणारे ८,००० अकाउंट बंद करण्यास सुरुवात केली. हिशेब चुकता...कंदहार अपहरण, मास्टरमाइंड अब्दुल रऊफ ठार २४ डिसेंबर १९९९ ला कंदहार इंडियन एअरलाइन्सचे विमान आयसी-८१४ अपहरण करणारा मास्टरमाइंड अब्दुल रउफ अजरही ऑपरेशन सिंदुरमध्ये ठार झाला. पाक मीडियाने त्याची पुष्टी केली. काठमांडू ते दिल्ली येणाऱ्या विमानाला हरकत -उल-मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांनी अपहरण करून ते तालिबान शासित अफगाणिस्तानला घेऊन गेले होते. त्याद्वारे मसूद अजहरची सुटका करून घेतली गेली होती. रउफला अमेरिकेने २ डिसेंबर २०१० रोजी जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले होते. अजहर दडून बसल्यानंतर २००७ मध्ये त्याचा भाऊ रउफ जैशचा म्होरक्या झाला. त्याच्या दहशतवादी संघटनेने भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. २००२ मध्ये पत्रकार डॅनियल पर्लची हत्या, २६/११ मुंबई हल्ला, २०१६ ला पठाणकोट हल्ला, २०१९ ला पुलवामा हल्ला या संघटनेने केला. पाकचे सुरक्षा कवच उद्ध्वस्त, ड्रोन हवेतच उडवले, जगाने पाठ फिरवली 1. पाकची एअर डिफेन्स सिस्टिम उघडी पडली : भारताच्या ड्रोन हल्ल्यांपुढे गुरुवारी पाकची एअर डिफेन्स सिस्टिम उघडी पडली. पाकिस्तानने चीनकडून HQ-9BE एअर डिफेन्स सिस्टिम घेतली आहे. भारताचे डझनभर ड्रोन पाकच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देत अनेक शहरांतील लक्ष्यांवर जाऊन स्फोट करण्यात यशस्वी ठरले. पाकिस्तान एकाही ड्रोनला थांबवू शकला नाही. १९७१ च्या आठवणी ताज्या करत भारताने कराचीच्या बंदरावर स्फोट घडवले. नौसेना तळाच्या सुरक्षेतही अपयश आले. 2. पाक लष्करप्रमुख मुनीर यांची खुर्ची धोक्यात : भारताविरोधात विष ओकणारे आणि पहलगाममधील दहशतवाद्यांना आश्रय देणारे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर आता स्वतःच आपल्या जाळ्यात अडकत चालले आहेत. बलुचिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अपयशी ठरलेले पाकिस्तानी लष्कराचे अनेक कोअर कमांडर भारताविरुद्ध मोर्चा उघडण्याच्या मुद्द्यावर मुनीर यांच्या विरोधात बंड करू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार या कमांडरांचे मत आहे की पाक लष्कर अपुरी तयारी करून युद्धात उतरले आहे. 3. मुस्लिम देशांचेही पाकिस्तानकडे दुर्लक्ष: ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने जेव्हा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तेव्हा पाकिस्तानला वाटले होते की संपूर्ण इस्लामी जग त्याच्या पाठिशी उभे राहील. मदत न मिळाल्याने त्याने आर्जवही केले, मात्र 57 इस्लामी देशांच्या संघटनेने (OIC) ना आपत्कालीन बैठक बोलावली ना पाकिस्तानच्या समर्थनार्थ कुठलेही निवेदन दिले. सौदी अरेबियानेही मौन पाळले. यूएई आणि कतारसारखे देशही पाठिंब्यासाठी पुढे आले नाहीत. 4. कराचीतील शेअर बाजार दोन दिवसांत ९% नी कोसळला : पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या शेअर बाजार कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक KSE-100 दोन दिवसांत 9% (10,314 अंकांनी) खाली आला. गुरुवारी ड्रोन स्फोटांच्या बातम्यांनंतर KSE मध्ये अचानक 6.3% घसरण झाली. त्यामुळे व्यवहार एक तास थांबवावा लागला. यामागील मोठे कारण म्हणजे पाकिस्तानची कमकुवत आर्थिक स्थिती. IMF ने पाकिस्तानच्या जीडीपीचा अंदाज 3.2% वरून 2.6% वर आणला आहे. सर्व विमानतळांवर एअर मार्शल; आता चेकइन तीन तास आधी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) सर्व विमान कंपन्या व विमानतळांना सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व विमानतळांवर एअर मार्शल तैनात केले जातील. आता बोर्डिंग ७५ मिनिटे आधी होईल. प्रवाशांना विमानतळावर किमान ३ तास ​​आधी पोहोचणे आवश्यक आहे. प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणी करावी लागेल. टर्मिनल इमारतीत पर्यटकांना प्रवेश बंद राहील. विमानतळावर प्रवेश करण्यासाठी फोटो ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असेल. आयपीएल सामने रद्द : ओटीटीवर पाक कंटेंटवर बंदी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर गुरुवारी सामना मध्यावरच रद्द करण्यात आला. आयपीएलचा ५८ वा सामना पंजाब किंग्ज व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात होता. सामन्यात पंजाबच्या डावात १०.१ षटके खेळली गेली तेव्हा रात्री ९:२९ वाजता स्टेडियमचे फ्लडलाइट्स बंद करण्यात आले.
ओटीटीला वेसण; सरकारने देशातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया मध्यस्थांना पाकिस्तानी मुळाचा कंटेंट तत्काळ हटवण्याचे निर्देश दिले. यात वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्टचा समावेश आहे. राजनाथ म्हणाले... ऑपरेशन सिंदूर सुरूच, १०० अतिरेक्यांचा खात्मा भारताने पाकिस्तान-पीओकेत ऑपरेशन सिंदूरअंतर्गत आतापर्यंत १०० हून अधिक कट्टर दहशतवादी व त्यांच्या सहकाऱ्यांना ठार केले. गुरुवारच्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली. बैठकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी लष्करी कारवाईला पाठिंबा देत लष्कराचे कौतुक केले. सिंह म्हणाले, भारताला संघर्ष नकोय, पण पाकने हल्ला केला तर योग्य उत्तर देऊ. ऑपरेशन सुरूच आहे, त्यामुळे तांत्रिक तपशील शेअर करता येत नाहीत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला. २४ एप्रिलच्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एकजूट दाखवली होती. राहुल गांधी म्हणाले - आपण सर्व सरकारसोबत; विरोधी पक्षनेते राहुल गांधीही बैठकीला उपस्थित होते. ते म्हणाले, ‘आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला.’ राहुल यांनी संकटाच्या काळात एकतेच्या आवश्यकतेवर भर दिला. त्याच वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सरकारसोबत उभे असल्याचे सांगितले. राहुल आणि सीपीआय(एम) नेते जॉन ब्रिटास यांनी या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली. यामुळे देशाच्या एकतेचा संदेश जाईल. तथापि, सरकारने कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. पाकिस्तानचा प्रत्येक लष्करी तळ आमच्या रेंजमध्ये, ६ दिवसांचे युद्ध त्यांचे सैन्य खिळखिळे करेल पाकिस्तानचा प्रत्येक लष्करी तळ भारताच्या हल्ल्याच्या कक्षेत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पहिल्या रात्रीच पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण जेव्हा पाकिस्तानने आयबीचे (आंतरराष्ट्रीय सीमा) उल्लंघन करत आमच्या शहरातील निवासी भागात बॉम्बहल्ले केले तेव्हा आम्हीदेखील आयबी ओलांडून प्रत्युत्तर दिले. रावळपिंडीतील पाक मुख्यालयावर भारताने केलेला हल्ला हा मोठा संदेश आहे. जर पाकिस्तानने माघार घेतली नाही तर त्यांचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले जातील, असे भारताने स्पष्ट केले आहे. भारताला पाणी, जमीन आणि नभात फायदा आहे. एक बटण दाबले तर पाकिस्तानचे लष्करी तळ उद्ध्वस्त होऊन जातील. भारताला पाकिस्तानच्या तुलनेत तिहेरी फायदा आहे. पहिला - तांत्रिक दक्षता. भारताकडे उत्तम तंत्रज्ञानाची लष्करी उपकरणे आहेत. सध्या ५०% पेक्षा जास्त शस्त्रे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली आहेत. तर पाकिस्तानी सैन्य चीन आणि तुर्कीकडून मिळणाऱ्या शस्त्रांवर अवलंबून आहे. त्याची पुरवठा साखळी खूप नाजूक आहे. तसेच, शस्त्रे हाताळण्याचे सैन्य प्रशिक्षण ही एक लांब प्रक्रिया आहे. पाकला मिळालेली बरीच शस्त्रे केवळ शोपीस आहेत. चीनकडून मिळालेली हवाई संरक्षण प्रणालीदेखील भारतीय ड्रोनविरुद्ध पूर्णपणे अपयशी ठरली. पाकिस्तानकडे अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली अचूकता नाही. दुसरे म्हणजे, युद्ध सुरू ठेवण्याची आवश्यक क्षमता. भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. त्यामुळे युद्ध लांबले तर आपण चांगल्या स्थितीत असू. पाकिस्तान अजूनही आयएमएफकडून कर्ज घेण्यासाठी रांगेत उभा राहतोे. रिकाम्या तिजोरीने सैन्य दीर्घ युद्ध करू शकत नाही. डब्ल्यूडब्ल्यूआर अहवालानुसार, पाकिस्तानकडे फक्त ६ दिवस युद्ध लढण्याची सामुग्री आहे. सातव्या दिवसापासून पाकिस्तानी सैन्य खिळखिळे होईल. या वर्षी निधीअभावी पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीत तोफांचे उत्पादन थांबवले आहे. तिसरे - सैन्याचे मनोबल. कुशल नेतृत्वामुळे भारतीय सैन्याचे मनोबल उंचावले आहे तर पाक सैन्य वांशिकतेवर विभागले आहे. पाकिस्तानच्या पंजाबी सैन्यात पश्तून, बलुच आणि सिंधीसारख्या इतर जातींना दुसऱ्या श्रेणीचा दर्जा आहे. पाक लष्करप्रमुख मुनीर यांना हे माहीत आहे. जनरल झिया यांच्या काळात पाकिस्तानी सैन्याचे इस्लामीकरण आता पूर्णपणे समोर आले आहे. मुनीर स्वतः एक इस्लामी कट्टरपंथी आहेत. पाकचे दु:साहस दिवसा ड्रोनबाजी, रात्रभर गोळीबार
पाकिस्तानमध्ये गुरुवारी लाहोर, कराची आणि गुजरांवाला यांसारख्या आठ महत्त्वाच्या शहरांमध्ये भीतीचे वातावरण होते. सीमावर्ती शहर लाहोरमधून लोकांनी पलायन सुरू केलं आहे. स्फोटांमुळे घाबरलेल्या लाहोरच्या एहतिशामचं म्हणणं आहे की, “प्रत्येक क्षणी हल्ल्याचा धोका जाणवत आहे, मी माझ्या कुटुंबासह फैसलाबादला जात आहे. तिथे शांतता मिळेल अशी आशा आहे.” फक्त लाहोरच नाही तर गुजरांवाला आणि सियालकोटमध्येही लोक शहर सोडत आहेत. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर लोक सामान घेऊन गर्दी करताना दिसत आहेत. इस्लामाबादमध्ये भारताच्या ड्रोन हल्ल्याच्या वेळी एअर रेड सायरनचा आवाज ऐकून लोकांमध्ये एकच अफरातफर माजली. एका बँकेत तर महिला कर्मचारी सायरन ऐकताच रडू लागल्या. इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये दुपारनंतर अनेक सरकारी व खाजगी कार्यालये रिकामी झाली. पंजाबात आणीबाणी, कराचीत ब्लॅकआउटपाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. शाळा-कॉलेज बंद आहेत. कार्यालयांमध्ये उपस्थिती खूपच कमी होती. रावळपिंडी, मुर्री, झेलम, सियालकोट यांसारख्या २५ शहरांमध्ये मॉक ड्रिल घेतली. अनेक शहरांमध्ये वीज बंद केली. इस्लामाबादमध्ये संसदेसमोरील ब्लू एरिया रिकामा करण्यात आला आहे. शुक्रवारीही इस्लामाबादमधील ब्लू एरियामधील सर्व कार्यालयं बंद राहतील.