News Image

देशात स्वच्छ सर्वेक्षणामधील बनवाबनवीला बसणार चाप:केंद्राच्याकडून विकसीत ॲपची हिंगोलीच्या दोन गावात पथदर्शी चाचणी, एजन्सीमार्फत गावांची होणार तपासणी


देशात आता केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने नियुक्त केलेल्या एजन्सी मार्फत गावात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 ची तपासणी होणार आहे. त्यासाठी विकसीत केलेल्या ॲपची पथदर्शी चाचणी हिंगोली जिल्हयातील दोन गावांमध्ये केली जात आहे. या ॲपमधील प्रश्‍नावली भरतांना येण्याऱ्या अडचणी दूर करून पुढील काही दिवसांतच संपूर्ण देशात ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील बनवाबनवीला चाप बसणार आहे. देशभरात केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 राबविले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून या उपक्रमासाठी सुरवात होणार असून यामध्ये देशभरातील ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छतेचे उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृहाची बांधणी व वापर, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, गावातील स्वच्छता, कचरा गोळाकरून विलगीकरण यासह इतर बाबींचा समावेश आहे. यापुर्वी या अभियानांतर्गत ग्रामपंचायत पातळीवरील राबविलेल्या उपक्रमांच्या तपासणीचे काम जिल्हा पातळीवरून केले जात होते. मात्र त्यानंतर आता केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने नव्याने ॲप विकसीत केले आहे. या ॲपमध्ये आठ मुख्य प्रश्‍न असून त्यामध्ये सुमारे ३० पेक्षा अधिक उपप्रश्‍नांचा समावेश आहे. गावातील अनुसुचीत जाती, जमाती व खुल्या गटातील गावकऱ्यांची निवड करून त्यांच्याकडून प्रश्‍नावली भरून घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्रपातळीवरूनच चार एजन्सीची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या एजन्सीच्या माध्यमातून गावात सर्वेक्षण केले जाणार असून गावकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रश्‍नावली भरून घेतली जाणार आहे. त्यामुळे देशात गाव पातळीवरील बनवाबनवी कमी होणार असून प्रत्येक गावांमध्ये स्वच्छतेची कामेच करावी लागणार असल्याने देशातील ग्रामीण भाग चकाचक होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, या ॲपमधील प्रश्‍नावली भरतांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेण्यासाठी देशातून हिंगोली जिल्हयाची निवड करण्यात आली असून त्यातही वाकोडी व वसमत तालुक्यातील दारेफळ या गावांची निवड केल असून त्या ठिकाणी तपासणी केली जात आहे. या ॲपच्या माध्यमातून तपासणीसाठी राज्य समन्वयक नितीन वर्मा, एजन्सीचे नोडल अधिकारी रणजितसिंह राजपूत, केतन फिरके, श्रीजीत सोळंकी, शुभम माने यांची नियुक्ती केली आहे. संबंधित अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, रघुनाथ कोरडे, भास्कर देशमुख, महेश थोरकर यांचे पथक कार्यरत आहे.