
निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार:NCP नेतृत्व बदलावर शरद पवारांचे मोठे विधान; इलेक्शन कसे लढवणार, ते सुद्धा सांगितले
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवार यांच्याविषयी तसेच पक्षाच्या संघर्षाविषयी भाष्य केलं. त्यानंतर शरद पवारांनी पक्षातील नेतृत्व बदलावर देखील मोठे विधान केले आहे. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवार म्हणाले, 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जनतेचा प्रचंड मेळावा आणि पक्षाला उभारी आली. थोड्या दिवसातच महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सामान्य जनतेने संधी दिली. लोकांची सेवा करायची संधी दिली. सामान्य माणसाला संधी दिली तर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालवू शकतो. नावं घ्यायला अनेकांची नावं आहेत. जयंत पाटलांनी अर्थमंत्री म्हणून 10 वर्षं काम केलं आहे. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार पुढे पक्षनेतृत्वावर देखील शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करणार. राष्ट्रवादी पक्षाने सामान्य माणसाला संधी दिली आहे. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच 50 टक्के महिलांना निवडून द्या, असे आवाहन देखील शरद पवारांनी केले आहे. 50 टक्के भगिनींना निवडून द्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढवायच्या की कशा, याचा विचार जिल्हा नेतृत्वाला सोबत घेऊन करू, असे शरद पवार म्हणाले. विश्वास निर्माण करण्याच काम भगिनी सुद्धा करतात. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका दोन-तीन महिन्यांवर आल्या आहेत. आपल्याला 50 टक्के भगिनींना निवडून द्यायचे आहे. कर्तृत्वाचा वाटा पुरुषांचाच असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्या सुद्धा कर्तुत्व दाखवू शकतात. उद्याच्या निवडणुकीत 50 टक्के जागा भगिनींना द्यायच्या आहेत. हा धोरणात्मक निर्णय आपण घेतला आहे. तो यशस्वी करण्याचं काम दोन-तीन महिन्यात करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. पक्षात फूट पडेल असं कधी वाटत नव्हतं काही संकट आली, तर नाउमेद न होता पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. पक्षात फूट पडली. फूट पडेल असं कधी वाटत नव्हतं, पण पडली. मी याच्या संबंधी अधिक भाष्य करु इच्छित नाही. जे राहिले ते विचाराने राहिले. 1980 साली माझ्या हातात सत्ता नव्हती, त्याआधी होती. निवडणुका आल्या, 50 आमदार निवडून आले. सहा शिल्लक राहिले, बाकी पक्ष सोडून गेले. सहा राहिले त्यातले एक मला इथे दिसतायत कमल किशोर कदम. आमचा पक्ष सहाजणांवर आला. त्यानंतर पुन्हा निवडणूक आली. राष्ट्रवादीची संख्या 72 झाली. राज्य सरकारमध्ये पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे चिंता करू नका. आपण एकसंध राहू. जनतेशी बांधिलकी ठेवायची आहे. शेजारी राष्ट्रांसोबत आपले संबंध चांगले राहिले नाही शरद पवार यांनी देशहिताला पाठिंबा देण्याचा विचार मांडला. ते म्हणाले, देशाचा विचार दोन दृष्टिने केला पाहिजे. देशाचा विचार करताना राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही. पहलगाममध्ये हत्या झाल्यानंतर राष्ट्रवादीने देशहिताची भूमिका घेतली. शेजारी राष्ट्रासोबत आपले संबंध चांगले राहिले नाही. सुसंवादाची परिस्थिती बांगलादेश, श्रीलंका, चीन, पाकिस्तानसोबत नाही.