दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजितदादांची शेवटची इच्छा:दादा, सुप्रिया सुळे अन् तटकरेंमध्ये बैठक झाली होती, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजितदादांची शेवटची इच्छा:दादा, सुप्रिया सुळे अन् तटकरेंमध्ये बैठक झाली होती, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी सगळे ठरले होते. अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळेंची बैठक झाली होती. जयंत पाटलांच्या घरी पहाटेपर्यंत बैठका चालल्या," असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अजितदादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी, अशी भावनिक सादही त्यांनी यावेळी घातली. विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. अनिल देशमुख हे आज विदीप जाधव यांच्या साताऱ्यातील तरडगाव येथील घरी सांत्वनपर भेटीसाठी आले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणाबाबत मोठे गौप्यस्फोट केले. नेमके काय म्हणाले अनिल देशमुख? अनिल देशमुख यांनी दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत अनेक धक्कादायक तपशील समोर आणले आहेत. ते म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र आणण्यासाठी आतापर्यंत एकूण १२ ते १३ बैठका पार पडल्या होत्या. शेवटची महत्त्वाची बैठक राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या घरी झाली होती. ही बैठक रात्री १० वाजता सुरू होऊन पहाटे ३ वाजेपर्यंत चालली होती. या बैठकीला ८ ते १० प्रमुख नेते उपस्थित होते. अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांचीही या विषयावर स्वतंत्रपणे बैठक झाली होती. या सर्व चर्चांनंतर 'काय करायचे आणि कसे करायचे' हे सर्व ठरले होते. साहेबांना त्रास नको, हीच दादांची भावना अजित पवार यांच्या मनात शरद पवारांबद्दल असलेल्या आदराचा उल्लेख करताना देशमुख म्हणाले, "पवार साहेबांचे वय पाहता त्यांना आता अधिक त्रास देऊ नये, अशी अजितदादांची मनापासूनची भावना होती. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही दादांची शेवटची इच्छा होती. आम्ही त्यांच्याशी झालेल्या १२ बैठकांचा तपशील साहेबांनाही दिला होता. आता दादा आपल्यात नाहीत, पण त्यांची ही इच्छा पूर्ण व्हायला हवी." शपथविधीच्या घाईवर नाराजी आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर बोलताना देशमुखांनी सुनेत्रा वहिनींचे अभिनंदन केले, पण सरकारच्या घाईवर टीका केली. "सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या याचा आनंदच आहे, मात्र सध्या दुखवट्याची वेळ आहे. इतक्या घाईत शपथविधी उरकण्याची काहीच आवश्यकता नव्हती," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अंग रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाचे सांत्वन अनिल देशमुख यांनी यावेळी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. विदीप जाधव हे कर्तव्यदक्ष अधिकारी होते आणि अजितदादांच्या निधनासोबतच त्यांच्या कुटुंबावरही कोसळलेला हा डोंगर अत्यंत क्लेषदायक असल्याचे देशमुख म्हणाले.