जे घडतंय ते विचारधारेच्या पलीकडचे:अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस आघाडीवर एकनाथ शिंदेंचा घरचा आहेर; फडणवीसांसोबतच्या 'कोल्ड वॉर'वरही स्पष्टच बोलले...!
जे घडतंय ते विचारधारेच्या पलीकडचे:अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस आघाडीवर एकनाथ शिंदेंचा घरचा आहेर; फडणवीसांसोबतच्या 'कोल्ड वॉर'वरही स्पष्टच बोलले...!
'अंबरनाथमध्ये झालेल्या भाजप-काँग्रेस आघाडीबद्दल आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. तिथे पाहा काय होतंय ते. जे होतंय, ते विचारसरणेशी सुसुंगत नाही, याची जाण करून दिली होती. हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी लढत नाही. सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असे म्हणत भाजपला घरचा आहेर तर दिलाच, सोबत आरसाही दाखवला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘कोल्ड वॉर’ असल्याचा चर्चा होते. यावरही ते मनमोकळेपणाने बोलले. मुंबईत आजतक वृत्तावाहिनीच्या मुंबई मंथन या कार्यक्रमाच्या मंचावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर भाष्य करताना शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या तेव्हा विरोधकांनी कुठेही धांधलीचा आरोप केला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अचानक गैरप्रकारांची भाषा सुरू झाली, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्यामुळे ते केवळ आरोपांची आणि टीका-टिप्पणीची राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महायुतीतील उमेदवार निवडीवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी आत्मविश्वासाने भूमिका मांडली. महायुतीकडे उमेदवारांची मोठी रांग होती, इतकी की अनेक ठिकाणी निवड करताना अडचण निर्माण झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. याउलट विरोधकांकडे ना विश्वासार्ह मुद्दे आहेत, ना जनतेला सांगण्यासारखा अजेंडा आहे, त्यामुळे ते आरोपांवरच अवलंबून आहेत, असे त्यांनी नमूद केले. निवडणूक लढताना किंवा प्रचार करताना आपण कधीही विरोधकांवर वैयक्तिक टीका करत नाही, कारण ते आपले राजकीय संस्कार नाहीत, असेही शिंदे यांनी ठामपणे सांगितले. अंबरनाथमध्ये शिवसेना (शिंदे गट)ला बाजूला ठेवून भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याच्या प्रश्नावरही शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी पक्षसंस्था आहे आणि त्याच विचारधारेवर आपण ठामपणे उभे आहोत, असे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आहोत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती न झाल्यामुळे स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. जिथे ‘फ्रेंडली फाईट’ आहे, तिथेही स्थानिक प्रश्नांवरच प्रचार केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथमधील परिस्थितीबाबत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. सत्तेच्या राजकारणावर भाष्य करताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ते कधीही खुर्चीसाठी राजकारण करत नाहीत. सत्ता आजही महायुतीकडे आहे आणि भविष्यातही जनतेच्या पाठिंब्याने तीच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आम्ही डॉक्टर नाही, तरीही ऑपरेशन केलं,” अशा शब्दांत त्यांनी 2022 मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला. मात्र, त्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या हितासाठीच होत्या, असे त्यांनी ठामपणे सांगितले. राज्याच्या विकासासाठीच आपले प्रत्येक पाऊल असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ठाकरे बंधूंविषयी विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी थेट नाव घेण्याचे टाळले. मात्र, स्वतःच्या कार्यशैलीबद्दल बोलताना त्यांनी आपण मेहनतीने काम करणारा माणूस असल्याचे सांगितले. मी एकदा काही ठरवलं की ते पूर्ण करतो, असे सांगत त्यांनी 200 पेक्षा कमी जागा आल्या तर राजकारण सोडून शेती करीन, अशी पूर्वी केलेली घोषणा आठवण करून दिली. आपण जे बोलतो ते करून दाखवतो आणि कधी कधी न बोलताही काम करून दाखवतो, असे सांगत त्यांनी आपल्या कामगिरीवर भर दिला. सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड नाही ओवैसी आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युतींच्या प्रश्नावर शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. स्थानिक पातळीवरील गणित, कार्यकर्त्यांची भूमिका आणि परिस्थिती पाहून कुठे एकत्र लढायचं आणि कुठे स्वतंत्र जायचं हे ठरवलं जातं. मात्र, काहीही करा आणि सत्ता मिळवा, हा आमचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ता आली किंवा गेली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी कथित ‘कोल्ड वॉर’च्या चर्चांवरही शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. हे सगळे माध्यमांनी रंगवलेले विषय असल्याचे सांगत त्यांनी फडणवीस यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे अधोरेखित केले. फडणवीस आमदार असतानापासून आपली ओळख आहे आणि आम्ही एकमेकांना कधीही मोठे-छोटे मानले नाही, असे त्यांनी सांगितले. आपण मुख्यमंत्री असताना देखील फडणवीस यांना मुख्यमंत्रीच मानत होतो, असे सांगत त्यांनी दोघांचा समान अजेंडा राज्याचा विकास असल्याचे स्पष्ट केले. अर्थव्यवस्थेत मोदींचे योगदान महत्त्वाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली, यासाठी मोदींचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची आर्थिक क्षमता आहे, हे आम्ही नाही तर नीति आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि रस्त्यांच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वेळ द्या, आम्ही काम करणारे लोक मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. बांद्रा-वर्सोवा सी लिंक विरारपर्यंत नेण्याचा प्रकल्प, छेडानगर ते साकेत ते फाउंटन कट चौक असा एलिव्हेटेड रस्ता, बीकेसी ते कुर्ला अंडरग्राउंड टनल, पॉड टॅक्सी आणि बोरिवली टनल या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईची वाहतूक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. थोडा वेळ द्या, आम्ही काम करणारे लोक आहोत, असे सांगत मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.