पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत:अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य; म्हणाले- राजकारणापेक्षा पक्ष सावरणे गरजेचे
Category: Maharashtra |
31 Jan 2026
मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. शपथविधीच्या वेळी सभागृहात अजित पवार अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. वातावरण भावूक आणि तितकेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. या सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरली आहे. शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, अजित पवार यांची उणीव कोणत्याही परिस्थितीत भरून निघू शकत नाही. आमच्यासारखे अनेकजण आज दादांना खूप मिस करत होते, असे म्हणताना ते भावूक झाले. त्यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार यांनी अत्यंत जड अंतःकरणाने उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. सुनेत्रा वहिनींनी हे शिवधनुष्य उचलले आहे, असे म्हणत त्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी एवढी घाई का करण्यात आली, असा प्रश्न विचारण्यात आला असता मिटकरी म्हणाले की, हा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे. हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डामध्ये झाला आहे. आम्हाला तो निर्णय पाळावाच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोक टीका-टिप्पणी करतात, पण अशा वेळी पक्ष अधिक महत्त्वाचा असतो, असेही ते म्हणाले. दुःखाच्या या वातावरणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी सावरणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवर बोलताना मिटकरी यांनी आपली वैयक्तिक भूमिका मांडली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही माझी शंभर टक्के इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र, याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सांगत त्यांनी संयमही दाखवला. मी इतका मोठा नाही की या विषयावर अंतिम मत देऊ, असे म्हणत त्यांनी नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. आदरणीय साहेब आणि आम्ही एकत्र असलो पाहिजे. पक्ष एकत्र असला की दुसरे लोक घुसखोरी करणार नाहीत, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, पक्षातील एकजूट टिकवणे हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वांत महत्त्वाचे आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास पक्ष अधिक मजबूत राहील, असे त्यांचे मत होते. मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या आठवणी जाग्या केल्या. आज अजितदादा नाहीत, त्यामुळे काही बोलण्याची इच्छाही होत नाही, असे ते म्हणाले. शपथविधीच्या वेळी दिल्या गेलेल्या घोषणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या भावना अजूनही ताज्या आहेत. अशा वेळी राजकारणापेक्षा भावना आणि पक्षसंघटना सावरणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या चर्चांना अमोल मिटकरी यांच्या प्रतिक्रियेमुळे नवा आयाम मिळाला आहे. त्यांच्या वक्तव्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असा स्पष्ट संदेश समोर आला आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पक्षाची एकी अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीच्या दिशेने काही ठोस हालचाली होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.