मराठी
"धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकतेतून राजीनामा दिला, विरोधकांमुळे नाही":नीट पेपरफुटीवरून श्रीकांत शिंदेंचे विधान; कोचिंग क्लासेसच्या फिसवर नियंत्रणाचीही मागणी
✍️ ऑथर / संपादक: नातेपुते एक्सप्रेस
📅 28 July 2026, 11:42 AM
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर तीव्र चिंता व्यक्त करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत बोलताना शिक्षण क्षेत्रातील माफियांना रोखण्यासाठी आणलेल्या नव्या कठोर विधेयकाचे जोरदार स्वागत केले आहे. 'पेपरफुटीमुळे केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त होते', असे सांगत त्यांनी परीक्षा पद्धतीत बदल करून ती अधिक लवचिक करण्याची आणि कोचिंग क्लासेसच्या अवाढव्य शुल्कावर नियंत्रण आणण्याची महत्त्वपूर्ण गरज अधोरेखित केली आहे. तसेच सरकारमध्ये नैतिकता आहे आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला, विरोधकांच्या आंदोलनामुळे नाही दिला, असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, मी केवळ लोकप्रतिनिधीच नाही तर एक डॉक्टर सुद्धा आहे. नीटच्या तयारीसाठी किती संघर्ष करावा लागतो आणि त्यानंतर ते ही परीक्षा पास होतात. त्यानंतर सुद्धा त्यांना डॉक्टर बनण्यासाठी 10-12 वर्ष अभ्यास करावा लागतो. जेव्हा पेपर लीक होतो तेव्हा फक्त विद्यार्थ्यांचे स्वप्न नाही तर संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न तुटते. आता हे सगळं होऊ नये म्हणून एक अत्यंत महत्त्वाचे बिल आणले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. राजर्षि शाहू महाराजांनी कोल्हापुरात मोफत प्राथमिक शिक्षा लागू करून एक आदर्श दिला. मी संघर्ष करणाऱ्या युवकांना सांगू शकतो की हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. आज मी प्रत्येक युवाला सांगू इच्छितो की, कुठलीही परीक्षा तुमचे भविष्य नाही ठरवू शकत. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, त्यांनी केवळ 16 वर्षांचे असताना तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची स्थापना केली. सरकारमध्ये नैतिकता आहे म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला श्रीकांत शिंदे म्हणाले, पेपर लीकच्या घटनेनंतर आपल्या सरकारने तातडीने महत्त्वाची कारवाई केली. आम्ही सिस्टमची सफाई केली. दोषींना तुरुंगात टाकले. या सरकारमध्ये नैतिकता आहे म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. विरोधकांमुळे त्यांनी राजीनामा नाही दिला. आज या ऐतिहासिक बिलमुळे शिक्षण क्षेत्रातील माफियांना तुरुंगात टाकणे सोपे होणार आहे. एक परीक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य नाही ठरवू शकत पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, आज युवकांच्या मनात काय सुरू आहे, त्यांच्या वेदना काय आहेत? हे आपण समजून घेतले पाहिजे. नीट परीक्षा काय आहे? एक परीक्षा आहे. एनटीए ही संस्था या परीक्षेसंदर्भात निर्णय घेते. विद्यार्थ्यांचे भविष्य आपण केवळ याच परीक्षेवरून नाही ठरवू शकत. त्या दिवशी विद्यार्थ्याच्या घरी काही झाले आणि तो परीक्षेला नाही येऊ शकला तर त्याचे वर्ष वाया जाते. त्यामुळे आपल्याला या सिस्टमला बदलणे आवश्यक आहे. इतर देशात पाहिले तर तिथे अनेक वेळा परीक्षा देता येते. अशी व्यवस्था आपणही स्वीकारली पाहिजे. कोचिंग क्लासेसच्या फिसवर नियंत्रणाची मागणी श्रीकांत शिंदे म्हणाले, परीक्षेचा दबाव असतो, कुटुंबाचा दबाव असतो, आर्थिक परिस्थितीचा प्रश्न असतो. आज इथे कोचिंग क्लासचे मोठे बिझनेस बनले आहेत. यावर देखील आपण विचार केला पाहिजे. यावर आपण कशा पद्धतीने, कारण 3 लाख, 5 लाख फिस आकारली जाते, यासाठी कर्ज घेतले जात आहे. आज आमच्या महाराष्ट्रात जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा ज्यांची वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मोफत शिक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. तोच विचार आपण इथे देखील आणू शकतो.