रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करणारे हे 'इंडिया' आघाडीतीलच हल्लेखोर आहेत. यामुळे काँग्रेसला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका या प्रकरणात पूर्णपणे दुटप्पी आहे, असे म्हणत रांची येथे नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस, राहुल गांधी तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार म्हणाले की, रांचीतील या गंभीर घटनेवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बोबडी का बंद आहे? तेथील तरुण-तरुणी आणि विद्यार्थी हे आपले नाहीत का? या प्रकरणात मातोश्री आणि शिवतीर्थाचे दरवाजे बंद का आहेत? विरोधी पक्षांनी केवळ राजकीय सोयीची भूमिका घेण्याचे काम केले असून, ते कधीही विद्यार्थ्यांचे हित पाहत नाहीत. हेच त्यांचे धोरण असल्याने संसदेत केवळ 'नौटंकी' आणि गोंधळ घालण्याचे काम सुरू आहे.
"आम्ही उद्धव ठाकरेंना रांचीचे तिकीट पाठवून देतो, ते तिथल्या पीडित विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणार का?" असा थेट सवालही शेलार यांनी विचारला. आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज आशिष शेलार म्हणाले की, झारखंडमधील नोकरभरतीच्या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी तेथील तरुण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या कंपनीला दिले, ती कंपनी काळ्या यादीत कशी काय होती? त्यांनाच हे काम का दिले गेले? तसेच कोऱ्या सोडलेल्या उत्तरपत्रिका नंतर भरण्याचे काम कुठे झाले? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. J
PSC भरती प्रकरणी पारदर्शकता मागणाऱ्या मुलांवर तिथल्या सरकारने अत्यंत अमानुषपणे हल्ला केला असून त्यांना शत्रूसारखे बडवले आहे. महिलांवर लाठीचार्ज करणे, अश्रूधूर सोडणे आणि तारेचे कुंपण घालणे अत्यंत क्रूर आहे. तिथे केवळ JMM चे सरकार नसून काँग्रेसही सत्तेत सहभागी आहे. मग हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर कोणाच्या सांगण्यावरून झाला? राहुल गांधी आता कोणाचा राजीनामा घेणार की स्वतः राजीनामा देणार? असा प्रश्न त्यांनी केला. राहुल गांधींनी स्पष्टीकरण द्यावे अन् संसदेतून पळ काढू नये आशिष शेलार पुढे म्हणाले की, रांचीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अश्लील किंवा चुकीच्या भाषेचा वापर केला नाही. ते केवळ आपल्या न्याय्य मागण्या मांडत होते. तरीही त्यांना अशा प्रकारची वागणूक का देण्यात आली, यावर राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
भाजप या पीडित विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकारावर देशवासीयांना स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच, चालू संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी जनहितार्थ एकही मुद्दा न मांडता केवळ गोंधळ घातला आहे. गृहमंत्री अमित शहा सभागृहात येऊन संपूर्ण विषयावर निवेदन देतील आणि उत्तरही देतील. राहुल गांधी यांनी संसदेत खोट पसरवण्याचे काम केले आहे, त्यामुळे आता गृहमंत्र्यांचे उत्तर ऐकताना त्यांनी तिथून पळ काढू नये.