शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राहुल गांधींना आलेली नोटीस, स्वातंत्र्यदिनाचे भाषण, 'वंदे मातरम'चा मुद्दा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपमधील प्रवासावर राऊतांनी खळबळजनक विधाने केली आहेत. राज्यात आणि देशात शोधून शोधून 'इडियट्स' गोळा करून सरकार चालवले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. "हे तर इडियट कॅबिनेट, करा माझ्यावर तक्रार" सातारा येथील मंत्र्याबाबत (जयकुमार गोरे) बोलल्यामुळे आपल्याला नोटीस आल्याचे सांगत राऊत म्हणाले, "जर 'इडियट' हा शब्द असंसदीय असेल, तर सेन्सॉर बोर्डाने त्यावर बंदी आणली पाहिजे. भाजपच्या लोकांना इडियट का म्हटले जाते, हे लोक रोज पाहतात. देशात आणि महाराष्ट्रात शोधून शोधून इडियट लोक एकत्र आणले आहेत आणि त्यांना कॅबिनेट व राज्यमंत्री केले आहे. हे सगळे 'इडियट कॅबिनेट' आहे, घ्या आता माझ्यावर तक्रार करा," असे खुले आव्हान राऊत यांनी दिले. पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना 'वंदे मातरम'चे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांच्यावर 'अर्धवट वंदे मातरम म्हणजे बौद्धिक नक्षलवाद' अशी टीका केली होती.
याचा समाचार घेताना राऊत म्हणाले, "वंदे मातरम हे राष्ट्रगाण म्हणून काँग्रेसने स्वीकारले आहे, भाजपने नाही. वंदे मातरमची एकूण सहा कडवी आहेत. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, त्यांनी टेलिप्रॉम्प्टरशिवाय वंदे मातरमची दोन तरी कडवी म्हणून दाखवावीत." लाल किल्ल्यावरील भाषण आणि गिरीश महाजनांवर निशाणा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावरून राऊतांनी पंतप्रधानांवर टीका केली. "काल लाल किल्ल्यावर पंतप्रधानांचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला, तेव्हा त्यांना वाचताही येत नव्हते," अशी खोचक टीका राऊतांनी केली. तसेच गिरीश महाजनांना 'चंपतराव' असा टोला लगावत ते म्हणाले, "ज्या मंत्र्याला हा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे शेजारच्याला विचारावे लागते, त्यांचा स्वातंत्र्यदिनाशी काय संबंध?" राहुल गांधींचे समर्थन आणि अमित शाहांवर प्रहार काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'अंधभक्त' शब्दावरून नोटीस आल्याबद्दल राऊतांनी संताप व्यक्त केला. "अंधभक्त म्हटल्याबद्दल राहुल गांधींना नोटीस पाठवणे हा सरकारचा मूर्खपणा आहे. देशाचे गृहमंत्री जेव्हा संसदेतून पळून जातात, तेव्हा त्यांना काय म्हणायचे? त्यांना शौर्यचक्र द्यायचे की परमवीर चक्र? राहुल गांधी जे बोलले ते अगदी बरोबर आहे," असे राऊत म्हणाले.
गोपीनाथ मुंडेंबाबत मोठा दावा पत्रकार परिषदेच्या शेवटी राऊत यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक मोठा दावा केला. "गोपीनाथ मुंडे यांचा भाजपमध्ये प्रचंड छळ झाला होता. जर गोपीनाथ मुंडे त्यावेळी काँग्रेसमध्ये गेले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते," असे खळबळजनक विधान राऊत यांनी केले. तसेच, बाबा रामदेव आता सावध झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. हेही वाचा.. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते?:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या- माझे वडील कमळात जन्मले अन् कमळातच विसावले भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत, आता दिवंगत नेत्याच्या जुन्या राजकीय घडामोडींवर चर्चा करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.