राष्ट्रवादीत कोणताही गैरसमज नाही:सुनील तटकरेंचा मोठा खुलासा; विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम, जयंत पाटलांच्या भेटीवरही स्पष्ट मत
Author: Rishiraaj Salunkhe |
Category: Maharashtra |
16 Jul 2026
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या आणि पक्ष विलीनीकरणाच्या उलट-सुलट चर्चांवर अखेर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पडदा टाकला आहे. "आमच्या पक्षात कोणताही गैरसमज नाही. आम्ही सर्वजण एकजुट आहोत आणि ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात, त्या आम्ही थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सांगतो," असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले. तसेच, शरद पवार गटासोबतच्या विलीनीकरणाच्या चर्चा आता भूतकाळ झाल्या असून त्याला पूर्णविराम मिळाला असल्याचे त्यांनी जाहीर केले. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे आली आहे. अलीकडेच पक्षाचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री 'वर्षा' निवासस्थानी घेतलेली भेट, सुनेत्रा वहिनींच्या निवडीला पक्षांतर्गत मिळालेली कायदेशीर नोटीस आणि शरद पवार गट महायुतीत (NDA) येणार असल्याच्या चर्चांमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींवर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम "स्वर्गीय दादा असताना दोन्ही गट एकत्र येण्याबाबत आणि विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती, हे वास्तव आहे. मात्र, दादांच्या निधनानंतर या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला. नुकत्याच झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही आता विलीनीकरणाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नव्याने कुठेही चर्चा सुरू नाही," असे तटकरे म्हणाले. जयंत पाटलांच्या भेटीशी संबंध नाही मध्यरात्री 'वर्षा'वर झालेल्या बैठकीबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, त्यांचा आणि शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भेटीचा काडीमात्र संबंध नाही. जयंत पाटील हे ज्येष्ठ आणि स्वयंभू नेते असून ते सांगलीच्या नगरपालिकेच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले होते. तर, प्रफुल पटेल आणि आपण स्वतः रायगड व मतदारसंघातील इतर विकासकामांच्या मंजुरीसाठी आधीच वेळ मागितली असल्याने तिथे गेलो होतो, असा खुलासा त्यांनी केला. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या नोटीसवर बोलताना तटकरे म्हणाले की, या विषयावर पक्षाच्या कोअर कमिटीत आणि देवगिरी बंगल्यावर सविस्तर चर्चा झाली आहे. लवकरच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत, ज्यामध्ये अर्थविभागासह अनेक महत्त्वाच्या शासकीय विषयांवर चर्चा केली जाईल. अजित दादांच्या जयंतीचे शासकीय आयोजन स्वर्गीय अजित दादांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीमधील योगदानाचा आदर करत राज्य सरकारने शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची जयंती साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याबद्दल तटकरे यांनी मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले. बॅनरवर दादांचा एकच फोटो लावण्याच्या आणि जिओ टॅगिंगच्या पक्षाच्या निर्णयावर आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसून, सर्वांनी 15 दिवसांपूर्वीच देवगिरीवर एकत्र येऊन हा मसूदा निश्चित केला असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेत फेरबदल होणार पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या रिक्त किंवा दीर्घकाळ कार्यरत असलेल्या पदांवर लवकरच पक्षाच्या कोर कमिटीमध्ये चर्चा करून नवीन नियुक्त्या केल्या जातील, असे संकेतही त्यांनी दिले. सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाला आलेली कायदेशीर नोटीस आणि संसदेतील रणनीती यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एनडीएमध्ये कोणताही नवीन पक्ष घेणार नाही' असे स्पष्ट केल्यामुळे, महायुतीचे जागावाटप आणि आगामी विधानसभेची रणनीती यावरच आता पक्षाचा पूर्ण भर असणार आहे. संबंधित बातमी वाचा… प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कपटी नेते:राष्ट्रवादीतील घडामोडींवर अंजली दमानियांची टीका, सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचा इशारा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. हे दोघेही "अतिशय कपटी नेते" असून पक्षात मोठा राजकीय कट सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, खासदार सुनेत्रा पवार यांनी वेळेत सावध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. येथे वाचा संपूर्ण बातमी