"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आषाढी एकादशीला घोषित करण्यात आलेल्या पहिल्या यादीतील 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज जवळपास 5 हजार 29 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. आधार ऑथेंटिकेशन पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्जखाते आता 'नील' (Zero) झाले आहे," अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी कर्जमाफी योजना, नाशिकमधील रस्ते आणि कुंभमेळ्याची कामे, तसेच राज्यातील इतर राजकीय आणि सुरक्षाविषयक घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. कर्जमाफीची पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया फडणवीस म्हणाले, "शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. ग्रामपंचायतींना पाठवलेल्या यादीनुसार शेतकऱ्यांनी फक्त आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून ऑथेंटिकेट करायचा आहे.
मध्यंतरी बँकांनी आकारलेल्या एनपीए (NPA) वरील अतिरिक्त व्याजामुळे कर्ज जास्त दिसत होते. मात्र, शासनाच्या सूचनेनुसार बँकांनी ते अतिरिक्त व्याज रद्द केले आहे. त्यामुळे शासनाने भरलेली रक्कम आणि शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जाची रक्कम समान झाल्याने खाती पूर्णपणे नील झाली आहेत." पुढील प्रक्रियाही सांगितली सध्या 18-19 लाख खात्यांची प्रक्रिया सुरू असून, 12 लाख खात्यांमध्ये काही तांत्रिक त्रुटी, नावांमधील तफावत किंवा दुबार नोंदणी असल्यामुळे ती बँकांकडे दुरुस्तीसाठी परत पाठवली आहेत. बँकांनी एका आठवड्यात ती दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले आहे. जसे शेतकऱ्यांचे आधार ऑथेंटिकेशन होईल, तसे टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे पैसे जमा होतील. तसेच, या योजनेत कोणतेही ओटीएस (OTS) नसल्यामुळे शेतकऱ्यांना 'सिबिल'ची (CIBIL) कोणतीही अट लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील विकासकामे आणि एमएनजीएलला (MNGL) खडसावले नाशिकमधील रखडलेली कामे आणि कुंभमेळ्याच्या तयारीवर बोलताना फडणवीस म्हणाले, "नाशिकमधील रस्त्यांची दुर्दशा प्रामुख्याने 'एमएनजीएल'च्या (MNGL) गॅस पाईपलाईनच्या कामामुळे झाली आहे. त्यांनी आतापर्यंत 4 लाख पैकी किमान 2 लाख कनेक्शन देणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी फक्त 44 हजार कनेक्शन दिले आहेत. त्यामुळे घरगुती कनेक्शन देताना त्यांना पुन्हा रस्ते खोदावे लागत आहेत. आम्ही एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना बोलावून कडक शब्दांत खडसावले असून, त्यांना कामाचा नवा आराखडा सादर करण्यास सांगितले आहे."
तसेच, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या कंपन्यांना पत्र पाठवून, रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेले डांबर राखून ठेवण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादी साहित्य आणि जनसुरक्षा कायदा दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या डार्क नेटवरील पुस्तके आणि पीडीएफ साहित्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाचे फडणवीस यांनी समर्थन केले. "बॉम्ब कसा तयार करायचा, एकट्याने हल्ला कसा करायचा, अशा प्रकारची माहिती देणारे साहित्य राज्यामध्ये फिरत होते. पूर्वी यावर बंदी घालण्यासाठी स्पष्ट कायदा नव्हता. मात्र, आता नवीन 'जनसुरक्षा कायद्या'नुसार (BNSS) राज्य सरकारने अशा देशविघातक साहित्यावर बंदी आणली असून, त्याचे वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा त्यांनी दिला. प्रशांत किशोर आणि मोहन भागवतांच्या विधानांवर प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसने (सुनेत्रा पवार गट) प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "त्यांनी अधिकृतपणे कोणाला सल्लागार नेमले आहे, याची माहिती आम्हाला अद्याप दिलेली नाही. जोपर्यंत ते आम्हाला अधिकृतपणे कळवत नाहीत, तोपर्यंत मी यावर बोलणे योग्य नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे."
दुसरीकडे, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच आलेल्या विधानावर (जेन झी आंदोलन आणि सरकारला फटकारणे) फडणवीस यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली. "सरसंघचालक जे बोलतात, ते एखाद्या विशिष्ट पक्षासाठी किंवा संस्थेसाठी नसून संपूर्ण देशाच्या हितासाठी असते. सत्ताधारी असो वा विरोधक, सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा. जर विरोधकांना त्यांची विधाने पसंत पडली असतील, तर मी त्यांचे अभिनंदन करतो," असे फडणवीस म्हणाले.