माढा गेल्या पंचवीस वर्षांपासून अनेक आंदोलने करूनही सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कायमस्वरूपी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या तुळशी गावकऱ्यांनी "आमचे गाव विक्रीस काढले आहे, कोणीतरी विकत घ्या" अशी आर्त हाक देत उजनी पाणी संघर्ष समितीच्या वतीने माढा तहसील कार्यालयावर थाळीनाद आंदोलन केले. सन 2000 पासून सिना-माढा उपसा जलसिंचन योजना कार्यरत आहे. अनेक वर्षांपासून तुळशी गावाचा या योजनेत समावेश नव्हता. अनेक निवेदने व आंदोलनानंतर गावाचा समावेश झाला, मात्र समावेश होऊनही अद्याप पाणी आलेले नाही. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे गंभीर हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेती व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी 14 सप्टेंबरपासून 12 शेतकऱ्यांनी तुळशीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढला.
प्रलंबित सिना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी 14 तारखेपासून आंदोलन करूनही प्रशासनाने गंभीर दखल घेतलेली नाही. ठोस कारवाई न झाल्यास 18 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता गावातील मोकळ्या पाण्याच्या टाकीवर चढून सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ^सिना-माढा उपसा जलसिंचन सुरू झाल्यापासून तुळशी गाव पाण्यापासून वंचित आहे. अनेक आंदोलने करूनही निराकरण होत नाही. त्यामुळे सुप्रमा-3 मंजूर करून त्याचे टोकन मिळावे, या दोन प्रमुख मागण्यांची दखल न घेतल्यास सर्व नागरिक पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करणार आहेत.
प्रमोद वसेकर, आंदोलक, तुळशी