अमरावती जिल्ह्यात विधानसभेचा रणसंग्राम:जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला अमरावती, बडनेराचा आढावा

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून उद्या, मंगळवार, २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होईल. ही प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण आठ मतदारसंघ आहेत. दरम्यान उमेदवारी दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अमरावती व बडनेरा मतदारसंघाच्या कार्यालयात पोहचून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना योग्य त्या सुविधा देण्यात याव्यात. खर्च आणि परवानग्यांची योग्य माहिती देण्यात यावी. उमेदवारांना अर्ज, नमूने आणि आवश्यक त्या सूचना एकाचवेळी देण्यात याव्यात. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही कटियार यांनी दिले.राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा. निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी होणार आहे. त्यामुळे कोणतीही शंका आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. समस्यांबाबत अचूक माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी-वरुड, अचलपूर, दर्यापुर व मेळघाट या आठ विधानसभा मतदारसंघात दोन हजार ७०८ मतदान केंद्र राहणार आहेत. यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदानयंत्राच्या (इव्हीएम) २५ टक्के अधिक मतदान यंत्र उपलब्ध झाले आहे. मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी केली आहे. ही मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आली आहेत. दरम्यान सरमिसळनंतर या मतदानयंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप लोकशाही भवनातून सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघाला २० टक्के अधिक मतदानयंत्र वाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व्हीसीव्दारे आढावा अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील आठही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) आढावा घेतला. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु होत असल्याने त्यासाठी काय-काय तयारी आवश्यक आहे, याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

Share

-