भैय्याजी जोशी ऋषितुल्य, ते जे बोलले ते योग्यच:टीका करणाऱ्यांचे शिक्षण कोणत्या माध्यमात झाले? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मुंबईत मराठी शिकलीच पाहिजे असे काही नाही. तसेच घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी भैय्याजी जोशी यांना ऋषितुल्य भैय्याजी जोशी जे बोलले ते योग्य बोलले, असे म्हणत पाठिंबा दर्शवला आहे. भय्यूजी जोशी जे बोलले ते योग्य बोलले गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ऋषितुल्य भय्यूजी जोशी जे बोलले ते योग्य बोलले. मुंबईत भाषेची सक्ती करता येणार नाही. मराठी बोल म्हणून तुम्ही कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचे मी समर्थन करतो. त्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. या देशाला एकसंघ ठेवायचे असेल, या देशाला प्रांतवादापासून दूर ठेवायचे असेल, या देशाला भाषा भाषांवरील लढाईपासून थांबवायचे असेल, या देशाला प्रगतीकडे न्यायचे असेल तर मला असे वाटते की भाषा ही समजण्यासाठीचा आग्रह असावा. भाषा हा सक्तीचा आग्रह नसावा. भाषा ही जुलमी पद्धतीने लादली जाणारी नसावी पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, भाषा ही जुलमी पद्धतीने लादली जाणारी नसावी. भाषा ही समजण्याच्या आणि समजून घेण्यासाठीची असावी. भाषा ही इशाऱ्याची असते. भाषा बोलीभाषेची असते. मराठीत सांगायचे झाले तर आमच्या विदर्भाची वऱ्हाडी मराठी भाषा आहे, मराठवाड्यातील मराठी आहे, कोकणातील कोकणी आहे, मराठी आहे. महाराष्ट्रात वेगवेगळे प्रांत आहेत. पण भाषेची जननी एकच आहे. हे टीकाकारांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सदावर्ते म्हणाले. भैय्याजी जोशी हे ऋषितुल्य आहेत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, भैय्याजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेले आहे, ते भारतीय संविधानाची भाषा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेला आहे. एखादा गुजराती गुजरातीत बोलू शकेल, मराठी भाषिक मराठीत बोलू शकेल, उत्तर भारतीय असेल तर तो भोजपुरीत बोलू शकेल. हे लक्षात घेतले पाहिजे. हेच या देशाचे सौंदर्य आहे. हेच भारतीय संविधानाचे सौंदर्य आहे. इस्लामिक शासकाप्रमाणे जोर जबरदस्ती या देशात चालत नाही. भैय्याजी जोशी हे ऋषीतुल्य आहेत. त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे या देशातील प्रत्येकाने या वक्तव्याचे स्वागत करायला हवे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. ज्यांनी टीका केली त्यांचे शिक्षण कोणत्या माध्यमाच्या शाळेत झाले? उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, जे नेते टीका करत आहेत त्यांनी सांगा व त्यांचे शिक्षण कोणत्या माध्यमाच्या शाळेत झाले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना महापालिकेसाठी लोकांना उत्तेजित करायचे आहे, असे सदावर्ते म्हणाले. तसेच मुंबईची कोणती एक भाषा नाही, मुंबईत अनेक भाषा आहेत. मुंबई प्रत्येकाला प्रत्येक भाषा बोलण्याचा अधिकार आहे. गुजराती, भोजपुरी, हिंदी या सर्वांच्या भाषा आहेत.