छत्रपतींचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता:आक्षेपार्ह विधानानंतर राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी, व्हिडिओ शेअर करत दिले स्पष्टीकरण
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर ते चांगलेच चर्चेत आले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली होती. राहुल सोलापूरकर यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची या विधानामागची नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. मी महाराष्ट्रातला शिवप्रेमी नागरिक आहे महाराजांचा नखभरही अवमान करण्याचा माझा प्रयत्न नाही, असेही ते म्हणाले. राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी, इतिहास अभ्यासकांनी व राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, सचिन खरात यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर अनेक शिवप्रेमी संघटनांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्या या व्यक्तव्याचा निषेध केला होता. वाढता वाद बघून सोलपूरकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. काय म्हणाले राहुल सोलापूरकर?
राहुल सोलापूरकर म्हणाले, साधारण दीड-दोन महिन्यांपूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवर मी 50 मिनिटांची मुलाखत दिली होती. त्यातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहासातल्या काही रंजक गोष्टी कशा बनतात, यावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत काही गोष्टी बोललो. बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्र, फारसी-उर्दू अशा ग्रंथांमधल्या तरतुदी आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांच्या काही गोष्टी या वाचायला-अभ्यासायला मिळाल्या होत्या. त्यातल्या काही गोष्टींवर मी बोललो. हे बोलताना महाराजांनी कुणाला रत्न दिली, कुणाला पैसे दिले, असे काय काय केले, या सगळ्याचे एकत्रीकरण करताना महाराजांनी औरंगजेबाच्या इतर लोकांना कसे आपल्या बाजूने वळवून घेतले आणि तिथून स्वत:ची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी ‘लाच’ हा शब्द वापरला, असे राहुल सोलापूरकर म्हणाले. शिवरायांचा अवमान करण्याचे माझ्या मनातही येऊ शकत नाही
साम-दाम-दंड-भेद या चारही बाबतींत छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले, यावर मी वेगळे काही संगायची गरज नाही. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिकाही मी अत्यंत व्यवस्थित पार पाडली होती. सगळा इतिहास अभ्यासून, जगभर गेली अनेक वर्षं वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतची अनेक व्याख्याने मी दिल्याचे राहुल सोलापूरकर म्हणाले. जगभरातल्या लोकांनी ते वाखाणलेले आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असे हा बोलला, असे म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला, असे राहुल सोलापूरकर म्हणाले. इतिहास रंजक कसा केला जातो हे सांगण्याचा प्रयत्न
माझे यावर सांगणे आहे की, यात महाराजांचा नखभरही अवमान करण्याचा माझा प्रयत्न नाही. इतिहास रंजक कसा केला जातो हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यातील ‘लाच’ या शब्दामुळे जर शिवभक्त, शिवप्रेमी नाराज झाले असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी छत्रपतींचे गुणगाण करतच मोठा झालो आहे. गड-किल्ल्यांवर मी वाढलो आहे. मी रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच केली होती. मी महाराष्ट्रातला शिवप्रेमी नागरिक आहे. यावरून उगाच महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका. तुम्ही सांगत असाल तर, मी यापुढे शिवाजी या विषयावर काही बोलणारही नाही. माझे म्हणणे आहे की, एखाद्या शब्दावरून कीस पाडायचा आणि एका व्यक्तिमत्वाला लक्ष्य करायचे असे होऊ नये. लाच हा शब्द शिवाजी महाराजांसाठी अजिबात नव्हता, असे स्पष्टीकरण राहुल सोलापूरकर यांनी दिले. राहुल सोलापूरकरांचे ‘ते’ विधान काय होते?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचे मोठेपण कळावे म्हणून हिरकणीची कथा रचली गेली आहे. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगत. हिरकणी घडलेलीच नाही. असे काहीही नाही. असा इतिहासच नाही. पण ते लिहिले गेले, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली. मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे त्याचे. त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही आहे अजूनही. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेले आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही, असाही दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता.