धनंजय मुंडेंचा राजीनामा हे केवळ नाटक:वैद्यकीय कारण म्हणजे हास्यास्पद, प्रणिती शिंदे यांची सरकारवर टीका

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आले व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याच सोबत मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा धनंजय मुंडे यांच्याशी जवळचा संबंध असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, अतिशय क्रूरपद्धतीने हत्या करण्यात आली आहे. मी त्यांच्या मुलीचे व पत्नीचे ऐकले तसेच त्यांच्या भावाचे ऐकले आणि खरे तर त्याच वेळी तो राजीनामा झाला पाहिजे होता. पण अतिशय निगरगट्ट असे हे सरकार आहे. आणि जे आपण बघत आहोत व्हिडिओ काढून कोणीतरी दाखवला जात आहे ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी करण्यात आले? मला असे वाटते की राजीनामा जरी दिला असला तर तो राजीनामा एक प्रकारचे नाटक आहे. आता ते म्हणत आहेत की वैद्यकीय कारण म्हणजे ते स्वीकारत पण नाहीत. म्हणजे बघा इतके हे हास्यास्पद असेल ही गोष्ट म्हणजे ते म्हणतात की वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा दिला. पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, थोडे जरी वाटत असते की मी याची जबाबदारी घेतो कारण हे जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावले आणि कोणाच्या ऑर्डर होत्या, तो कोणाचा माणूस होता आणि एवढेच नाही पण यांचे नाव आरोपी म्हणून पण आले पाहिजे अशी आमची मागणी आहे. याच्यावर कारवाई झाली पाहिजे. खासकरून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमके हे कशामुळे झाले आणि कसे झाले याच्या खोलपर्यंत गेले पाहिजे. यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही हे आपल्याला दिसून येते. त्यामुळे आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव आलेच पाहिजे अशी आमची मागणी आहे. नैतिक जबाबदारी घेऊन तो राजीनामा झाला पाहिजे होता आणि आरोपी म्हणून त्यांचे नाव येणे गरजेचे आहे. आमदारकी पण म्हणजे लोकांसमोर येण्याचा देखील आता यांचा चेहरा राहिलेला नाहीये. राजीनामा देऊन परत 6 महिन्यानंतर मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कारण हे सरकार दाखवण्यापूर्तेच नाटक करेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा काही निष्पन्न नाही झाले म्हणून स्टेटमेंट येईल म्हणून त्यांना आरोपी म्हणून नेमले गेले पाहिजे, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

Share