महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपचा कुटील डाव:नीतेश राणेंच्या विधानावर हर्षवर्धन सपकाळ संतप्त प्रतिक्रिया, हकालपट्टीची मागणी

महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषित करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याचाच भाग म्हणून नीतेश राणेंना पुढे करून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपचा कुटील डाव असून तो जनतेने ओळखावा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. राज्याचे मत्स्यपालन व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या विधानाचा हर्षवर्धन सपकाळ यांनी समाचार घेतला. हा मंत्री मटन कोणाकडून घ्यायचे व कोणाकडून घ्यायचे नाही हे जाहीरपणे सांगत आहे. कोणी काय खावे व कोणाकडून काय विकत घ्यावे, हे सांगण्याचा अधिकार ह्या मंत्र्याला कोणी दिला? असा सवाल सपकाळ यांनी केला. हलाल, झटका, किंवा आणखी काय हे जनतेला ठरवण्याचा अधिकार आहे, हे मंत्र्यांचे काम नाही, असेही ते म्हणाले. नीतेश राणेंकडून समाजात विष कालवण्याचे काम नीतेश राणे यांचा कोणताही अभ्यास नाही, कोणताही विचार नाही, केवळ माझा बॉस सागर बंगल्यावर आहे व माझे कोणी काही करू शकत नाही अशी जाहीर विधाने करून समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. याआधीही नीतेश राणेंच्या गुंडांनी कणकवली मध्ये शेख अशरफ या तरुणाला “जय श्रीराम बोल” म्हणत मारहाण केली, याप्रकरणी कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश देऊनही कारवाई केली जात नाही. नीतेश राणे उघडपणे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून दंगली भडकावण्याचा प्रयत्न करत असतात. पण अद्याप त्यांच्यावर कारवाई झाली नाही, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलिस विभाग काय झोपा काढत आहे का? असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे. महाराजांच्या सैन्यात असंख्य मुस्लीम सैनिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लीम नव्हता असे विधान करून या नीतेश राणेंनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. या महाशयाचे विधाने पाहता त्यांना कशाचाही अभ्यास नाही, इतिहासाचा तर अजिबात गंध नाही, असे स्पष्ट दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सरनोबत नूरखान बेग तर तोफखाना प्रमुख इब्राहीम खान होता, महाराजांचा अंगरक्षक इब्राहिम सिद्दी तर वकील काझी हैदर होता. अफजल खान भेटीच्यावेळी 10 अंगरक्षकांमध्ये हा इब्राहिम सिद्दी होता. तर महाराज आग्र्याच्या कैदेत असताना हिरोजी फर्जत बरोबर मदारी मेहतर ह्या मुस्लीम सेवकाने महत्वाची जबाबदारी पार पाडली होती, यांच्यासह असंख्य मुस्लीम सैनिक महाराजांच्या सैन्यदलात होते. पण ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि गरळच ओकायची ठरवले असेल तर त्यांच्यावर जालीम इलाज केला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा बंदर विकास मंत्री नीतेश राणे दररोज संविधान आणि कायद्याला पायदळी तुडवून सातत्याने प्रक्षोभक, भडकाऊ व हिंदू मुस्लीम अशी गरळ ओकत आहेत, त्याला मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे का? आणि नसेल तर राणेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Share