रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड प्रकरण:फरार आरोपींचे पोलिसांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यांना आकाचे पाठबळ; एकनाथ खडसेंचा आरोप
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मात्र, तीन आरोप अद्याप फरार आहेत. यावरून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठा आरोप केला आहे. फरार आरोपींना स्थानिक नेत्याचे संरक्षण असल्याचे एकनाथ खडसे म्हणालेत. तसेच त्या आरोपींचे पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे पोलिस त्यांना जाणीवपूर्वक अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्या प्रकरणी पोलिसांमध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण अल्पवयीन आहे. तर दुसरीकडे आणखी तिघे जण पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत. यामध्ये पीयूष मोरे, चेतन भाई आणि सचिन पालवे यांचा समावेश आहे. हे तिघेही अद्याप फरार आहेत. केंद्रीय मंत्र्यांची छेड काढल्यानंतरही तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यातच आता एकनाथ खडसे यांनी उपरोक्त गंभीर आरोप केले आहेत. नेमके काय म्हणाले एकनाथ खडसे? छेडछाडीच्या घटनेला 10 दिवस झाले. घटना घडल्यानंतर आत्तापर्यंत पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेता आलेला नाही. चार जणांना अटक केलेली आहे. तीन प्रमुख आरोपी आहेत, ते फरार आहेत. पण ते फरार झालेले नाहीत, तर इथले जे आका आहेत. राजकीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पंखाखाली ते लपलेले असल्याचा आरोप खडसे यांनी केला. आरोपींच्या पाठीमागे राजकीय शक्तीच असल्याचे ते म्हणाले. मी पूर्वी देखील म्हटले होते. पोलिस आणि आरोपींचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत. सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. केंद्रीय मंत्री सत्तेत असल्या तरी राज्याचे गृह खात राज्याकडे आहे. याठिकाणी गृहखात्याने पूर्ण प्रयत्न करुन सुद्धा आरोपी मिळत नाहीत, याचा अर्थ असा की, स्थानिक पोलिस अपयशी आहेत. राज्यातील चित्र पाहिले तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते आहे की, काय असे वाटत आहे, अशी टीका खडसेंनी केली. नेमके प्रकरण काय? मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरते. रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षारक्षकांसोबत या जत्रेमध्ये गेली होती. यावेळी काही टवाळखोर तरुण त्यांचे परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला. या संशयावरून त्यांनी या तरुणाच्या हातामधील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली. या घटनेचा राग येऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकासोबत झटापट केली होती. हा प्रकार समजल्यानंतर रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला होता. छेड खानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली होती. इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते तर सर्वसामान्य मुलींचा काय होणार? असा सवालही रक्षा खडसे यांनी पोलिसांना केला होता. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यामध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत.