रतन टाटा यांच्यासाठी देश लुटण्याचे साधन नव्हते:त्यांनी देश घडविला, ते कायम मनात राहतील- संजय राऊत
उद्योगपतींच्या निधनानंतर कुणी हळहळत नाही, पण रतन टाटा हे असे व्यक्तीमत्व होते की ते देशातल्या घराघरात पोहोचलेले नाव होते. ते गेल्याने देश हळहळतोय. याचे कारण असे आहे की टाटांनी आपल्याला भरपूर दिले आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, टाटांसाठी देश लुटण्याचे साधन नव्हते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, सामाजिक कार्यातील आणि मुंबईसारखे शहर घडवण्यातील त्यांच्या योगदानाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. रतन टाटा कमालीचे देशभक्त संजय राऊत म्हणाले की, उद्योगपतीला नफा आणि तोटा हे दोनच शब्द माहिती असतात, जे आपण पाहत आहोत. पण टाटा हे कमालीचे देशभक्त होते. आज उद्योगपतींसाठी देश हा लुटण्याचा खजिना आहे. पण टाटांसाठी देश हे निर्मितेचे साधन होते. त्यांनी देश घडवला, त्यांनी आम्हाला, तरुण उद्योजकांना प्रेरणा दिली.
उद्योगपती असतानाही प्रत्येकाला ते आपल्या घरातील एक व्यक्ती वाटत राहिले. जगामध्ये असे दुसरे उदाहरण नाही. उद्योगक्षेत्रात सचोटी, सत्य आणि प्रामाणिकपणा हे ब्रिद जर कुणाच्या नावात चिकटले असेल तर ते टाटा यांच्या. रतन टाटा कायम हृदयात राहतील संजय राऊत म्हणाले की, टाटा गेले याच्यावर अद्याप विश्वास बसत नाही. ते आमच्या हृदयात कायम राहतील. त्यांनी कोरोना काळामध्ये आमची किती काळजी घेतली हे आम्हाला माहिती आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सगळ्यात मोठी देणगी, हजारो कोटी रुपये देणारे टाटा होते. टाटा आणि देशातील जनतेचे नाते ममतेचे होते. टाटांनी फक्त माणसांची इस्पितळं निर्माण केली नाहीत, तर प्राणी, पक्षी, अनाथांसाठीही आपला खजिना रिकामा केला,असेही राऊतांनी म्हटले आहे.