श्रीगोंद्यात प्रतिभा पाचपुते यांच्याच उमेदवारीवर भाजप पक्षश्रेष्ठी ठाम:मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांच्या उमेदवारीसाठीचे पाचपुते यांचे प्रयत्न निष्फळ

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत श्रीगोंदे मतदारसंघातून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, आपल्याऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आ. पाचपुते व प्रतिभा पाचपुते यांनी तातडीने मुंबई गाठत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मात्र, प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीच भाजप पक्षश्रेष्ठी ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे श्रीगोंदे मतदारसंघात प्रतिभा पाचपुते याच भाजपच्या उमेदवार असतील, हे नक्की झाले आहे. भाजपने पहिल्या यादीत राज्यातील ९९ जागांवरील उमेदवार जाहीर केले. त्यात श्रीगोंदे-नगर मतदारसंघात प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर शहरातील शनि चौकात पाचपुते समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. दरम्यान, मुलगा विक्रमसिंह पाचपुते हे गेल्या काही दिवसांत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले असून, आ. पाचपुते हे आजारी असताना मंत्रालयीन कामांचा पाठपुरावा त्यांनीच केला. त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव असल्याने विक्रमसिंह पाचपुते यांनाच विधानसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी आ. पाचपुते व प्रतिभा पाचपुते हे रविवारी (२० ऑक्टोबर) तातडीने मुंबईला रवाना झाले. उपमुख्यमंत्री फडवणवीस यांची त्यांनी सोमवारी सकाळची वेळ घेतली होती. प्रसार माध्यमातूनही याबाबतच्या बातम्याही समोर आल्या. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी प्रतिभा पाचपुते यांच्याच उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार या प्रतिभा पाचपुते याच असतील, हे निश्चित झाले आहे. आभार मानण्यासाठी मुंबईला गेलो होतो भाजप कार्यकर्त्यांनी आमदार बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते व विक्रमसिंह पाचपुते अशी तीन नावे उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. आ. बबनराव पाचपुते हे आजारी असल्याने प्रतिभा पाचपुते यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. भाजपने केंद्रीय पातळीवरून पहिल्याच यादीत प्रतिभा पाचपुते यांचे नाव समाविष्ट केल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानण्यासाठी मुंबईला गेलो होतो. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा मुंबईला गुलाल घेऊनच या, असे सांगितल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.

Share

-