निलंबनानंतर शिवराज राक्षेची प्रतिक्रिया:म्हणाला – पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा
अहिल्यानगरमध्ये रविवारी 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत पैलवान पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला चितपट केले. या सामन्यात 40 सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षेने पंचांशी वाद घातला. तसेच एका पंचाला लाथ देखील मारली. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेने त्याला तीन वर्षांसाठी निलंबित केले. या निलंबनानंतर शिवराज राक्षेने प्रतिक्रिया दिली. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा, असे तो म्हणाला. नेमका काय म्हणाला शिवराज? सर्वकाही चुकीचे झाले असून सर्वांनी ते पाहिले आहे. कुस्तीचा व्हिडिओ तपासण्याची आम्ही विनंती केली होती. व्हिडिओ पाहूनच कुस्तीचा निर्णय घ्या, असे म्हणालो होतो. थर्ड अम्पायरला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे आम्ही व्हिडिओची मागणी केली. दोन्ही खांदे टेकले असतील तर आम्ही हार मानायला तयार आहोत. कुस्तीत हार जीत होत असते. पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या खेळाडूचे नुकसान होत असेल तर महाराष्ट्रात किती खेळाडू आहेत, प्रत्येक खेळाडूवर अन्याय होत राहिला तर पंचांवर आक्षेप घेतला पाहिजे, असे शिवराज राक्षे म्हणाला. शिवराज पुढे बोलताना म्हणाला की, मी वारंवार हेच सांगतो होतो की, रिव्ह्यु दाखवा. त्यानंतर निर्णय घ्या. त्यानंतर घेतलेला निर्णय मान्य आहे. पण ते व्हिडिओही दाखवत नव्हते. विनंती करूनही त्यांनी मान्य केले नाही. मला शिविगाळ केली. म्हणून मला टोकाचे पाऊल उचलावे लागले. एखाद्या पैलवानावर अन्याय होत असेल तर तो गप्प बसणार नाही. तुम्ही नंतर मान्य करता की पंचांकडून चुकी झाली आहे. मग त्या पोझिशनचे पॉइंट देऊन पुढे खेळ सुरू ठेवला पाहिजे होता. पंचांनी स्वतः मान्य केलंय की चुकी झाली आहे. त्यामुळे पंचांवरही आक्षेप घेतला पाहिजे, जेणेकरून ते पुढच्यावेळी काळजी घेतील, असेही शिवराज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला. …तर मग पंचांवर कारवाई का नाही? – शिवराजची आई
दरम्यान, पंचांनी माझ्या मुलाला आदल्या दिवशी शिवीगाळ केली होती. माझ्या मुलावर जर निलंबनाची कारवाई केली, तर मग पंचांवर कारवाई का नाही? पंचांना शिक्षा का केली जात नाही? असा सवालही त्याच्या आईने केला. आमचा मुलगा गरीब घरातला आहे. पंचांनी रिप्ले का दाखवला नाही? चूकही मान्य केली पण ती नंतर मान्य केली. माझ्या मुलाचे इतकेच म्हणणे होते की रिप्ले दाखवा. तो दाखवला नाही. पंचांनी शिवीगाळ करणे किती बरोबर आहे? तीन वर्षे जर त्याचे निलंबन केले आहे, तर मग पंचावर कारवाई केली पाहिजे, त्यांचीही चूक आहेच. मागच्या वर्षीही शिवराज राक्षेवर अन्यायच करण्यात आला. हे नेहमी घडत आले आहे, असे शिवराजच्या आई म्हणाल्या. अंतिम सामन्यातही झाला गोंधळ उपांत्य फेरीनंतर अंतिम सामन्यातही गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. पृथ्वीराज मोहोळने महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. यावेळी महेंद्र गायकवाडने देखील पंचांबरोबर वाद घातला. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने त्यालाही तीन वर्षांसाठी निलंबित केले.