19 मार्चला महाराष्ट्रात सर्वदूर अन्नत्याग:शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची किसानपुत्र आंदोलनची मागणी

19 मार्च रोजी महाराष्ट्रातील लाखो शेतकरी व किसानपुत्र अन्नत्याग करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना सहवेदना प्रकट करणार आहेत. ठिकठिकाणी सामूहिक उपोषणाचे कार्यक्रम व सहवेदना सभा होणार आहेत. केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून 10 ते 15 टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जेवढ्या 50 ते 60 टक्के शेतकरी शेतीवर अवलंबून होते. याचा अर्थ असा की, केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावरील संकट अधिक वाढले आहे. महाराष्ट्रात दररोज 7 ते 8 आत्महत्या होत आहेत. म्हणून या वर्षी किसान पुत्रांनी 19 मार्चला अन्न त्याग करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी केले आहे. प्रतिकुटुंब 18 हजार द्या ज्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न येऊ लागले, त्या कुटुंबातील आत्महत्या टळल्या आहेत, असे दिसून येते. राहिलेल्या 10-15 टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबात शेतीबाह्य उत्पन्न कसे येईल याचा तातडीने विचार केला पाहिजे. सरकारी वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी 18 हजार रुपये महिना ठरवले आहे. तसे 18 हजार रुपये महिन्याला या कुटुंबांना पोचवण्याची तरतूद सरकारने करावी. यासाठी इतर अनुदान बंद करावी लागली तर ती बंद करावी, अशी सूचना अमर हबीब यांनी केली आहे. विशेष अधिवेशन बोलवा संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या साहेबराव करपे कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येला 19 मार्च रोजी 39 वर्षे होतात. या काळात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु लोकसभा व विधानसभेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा साधा ठराव देखील करण्यात आला नाही. राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनाशून्य झाले आहेत. 19 मार्च हा शेतकारी सहवेदना दिवस आहे, या दिवशी लोकसभा-विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन अमर हबीब यांनी केले. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींना तसे पत्रही पाठविले आहे. ग्रामपंचायतीचे ठराव लोकसभा-विधानसभा दखल घेईल की नाही, हे आज सांगता येत नाही, तरी आज गावो गावच्या ग्रामपंचायती, ग्रामसभांनी ‘आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धाजली’ अर्पण करणारा ठराव करून महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींना पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. उमरा येथे अन्नत्याग 19 मार्च रोजी, अमर हबीब व त्यांचे सहकारी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील उमरा या गावात अन्नत्याग करणार आहेत.या गावच्या भीमराव सिरसाट या शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी तहसील कार्यालयात फाशी घेऊन आत्महत्या केली होती. या गावात दुपारनंतर सहवेदना सभा होईल, अशी माहिती अमर हबीब यांनी दिली.