मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी गुजराती लादण्याचा डाव:भैय्याजी जोशींचा उद्दामपणा खपवून घेणार नाही; जाहीर माफी मागा- अतुल लोंढे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भैय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा व मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे पुढे असे म्हटले आहे की, मुंबईसह महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, परंतु आरएसएसच्या लोकांना मुंबई व मुंबईतील मराठी भाषा, मराठी जनता यांच्याबद्दल कायमच आकस राहिला आहे. मुंबईतील महत्वाची कार्यालये व संस्था, गुंतवणूक मुंबईबाहेर घेऊन जाण्याचा उद्योग भाजपाच्या राज्यात सतत होत आहे. आता मुंबईतील मराठी भाषेलाही कमी लेखून गुजरातीसह इतर भाषा लादण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्याच मानसिकतेतून भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य आहे. मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, जर कोणी मराठी भाषेचा अपमान करत असेल तर तो कदापी खपवून घेतला जाणार नाही. भैय्याजी जोशी यांचे विधान अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का? घाटकोपर हा मुंबईचाच भाग आहे असे असताना घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे म्हणण्याचे धाडस जोशी करुच कसे शकतात. घाटकोपरमध्ये लाखो लोक मराठी आहेत व ते मराठीच बोलतात. भैय्याजी जोशी यांच्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारने यावर भूमिका जाहीर करावी. भैय्याजी जोशी यांचे विधान अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का? त्यांनीही भूमिका जाहीर करावी असेही अतुल लोंढे म्हणाले. भैय्याजी जोशी यांचे नेमके वक्तव्य काय? भैय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तर गिरगावात हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणार्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही, असे ते म्हणाले होते. यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे.