संजय राऊत यांच्यामुळे आनंद दिघेंना टाडा लागला:साहेबांना तुरुंगात जावे लागले, खासदार नरेश म्हस्केंचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांना टाडा लागला होता, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते व खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच या संजय राऊत यांनी दिघे साहेबांना हार घालायची भाषा करू नये, असेही नरेश म्हस्के म्हणाले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला, यावेळी संजय राऊत आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जाणार होते, यावर नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. खासदार नरेश म्हस्के म्हणाले, खोपकर हत्याकांडा नंतर संजय राऊत यांनी लोकप्रभामध्ये एक लेख लिहिला होता. त्या लेखामुळे आनंद दिघे यांना टाडा लागला. त्यांना तुरुंगात जावे लागले. आता त्या संजय राऊत यांनी दिघे साहेबांना हार घालायची भाषा करू नये. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे यांचे नाव देण्याला विरोध करणाऱ्यांनी दिघे साहेबांचा पुतळ्याला पुष्पमाळ घालायची भाषा करू नये. पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, महाभारतात धृतराष्ट्र यांच्या जोडीला संजय होते. त्यांना दिव्यदृष्टी होती. हे संजय जर स्वतःला संजय समजत असतील तर त्यांनी जनतेच्या मनात काय आहे, त्याचाच विचार करावा. हे रात्रीच भांडुपच्या हातभट्टीची घेतात. त्यामुळे त्यांना स्वप्नातही एकनाथ शिंदे दिसतात. रात्रीची उतरली नसेल म्हणून सकाळी ते एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलले असतील. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे, ती शिल्लक सेना आहे. ही सेना त्यांनी सोनिया गांधींकडे गहाण ठेवली आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी पक्ष सोनिया गांधींकडे गहाण ठेवला होता, तो एकनाथ शिंदे यांनी सोडवला. नरेश म्हस्के पुढे म्हणाले, सावरकर यांची शपथ घेणाऱ्यांना मला एक सांगायचे आहे ज्यांनी सावकारांबद्दल अपशब्द वापरले, त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली त्या राहुल गांधी यांचे कपडे धुण्याचे काम तुम्ही का करत आहात? असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. शिवसेना उबाठाची अवस्था बिकट आहे. त्यांच्याकडचे नगरसेवकसुद्धा आता पक्ष सोडून जात आहेत. यामुळे ठाण्यामध्ये 100 ते 150 माणसे बसतील एवढ्याच हॉलमध्ये त्यांना मेळावा घ्यावा लागत आहेत.

Share