तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चालले:त्याला तुम्ही पाठीशी घालू नका, अजित पवारांकडे न्याय मागताना वैभवीला अश्रू अनावर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांच्याकडे न्यायाची मागणी करतात संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले. अजितदादा, तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चालले आहे, त्याला पाठीशी घालू नका, आम्हाला न्याय द्या अशी मागणी वैभवी देशमुखने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली. जर न्याय मिळाला नाही तर रस्त्याने चालताना धक्का लागला तरी हे आम्हाला जीवे मारतील, अशी भीतीही तिने व्यक्त केली. सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे. तपासयंत्रणांनी 1400 हून अधिक पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झाले आहेत. या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीयही सहभागी झाले होते. यावेळी वैभवी देशमुख यांनी बारामतीकरांसमोर आपल्या भावना मांडल्या. शेवटच्या वेळी बाबांना पाहता आलं नाही याची खंत वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली. नेमके काय म्हणाली वैभवी देशमुख? अजित पवारांना विनंती आहे की, माझे वडील गेलेत आम्ही न्याय मागतोय. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा. तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे हे राज्य नासत चालले आहे. त्याला तुम्ही पाठीशी घालू नका. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे, असे वैभवी देशमुख म्हणाली. अजितदादा हे असे व्यक्तिमत्व आहे की ते खऱ्याचं खरं करतात, खोट्याचे खोटे करतात. या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, असेही ती म्हणाली. ती खंडणी नेमकी कुणाला जात होती? एका दलित व्यक्तीला वाचवायला गेले तरी माझ्या वडिलांना अमानुष मारहाण झाली. एखाद्याला मदत करणे गुन्हा आहे का? ज्या खंडणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गेला ती खंडणी नेमकी कुणाला जात होती? त्यामध्ये माझ्या वडिलांचा गुन्हा काय होता? सरकारचे डोळे कधी उघडणार? असे सवालही वैभवी देशमुखने उपस्थित केले. मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता. मला चेहरा बघायला मिळाला नाही. इथून पुढे कधी चेहरा बघायला मिळणार नाही, असेही ती म्हणाली. … तर ते आम्हाला जीवे मारतील बीड जिल्ह्यातील ही घाण आम्हाला उचलून टाकणार आहे. आता आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर रस्त्याने चालताना धक्का लागला तरी हे आम्हाला जीवे मारतील, अशी भीती वैभवीने व्यक्त केली. त्यामुळे न्याय मिळाला पाहिजे. प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती असल्याचे तिने सांगितले.